भाषणाच्या वाचनाचा आदर्श वेग किती असावा?www.marathihelp.com

बोलण्याच्या परी तरी किती - व्याख्यान, आख्यान, वचन-प्रवचन, विवेचन, प्रतिपादन, निरूपण, वक्तृत्व, निवेदन, वचनामृत, तोंडपट्टा, वाणी, वदंती, घोषणा, उक्ती, तोंडपाटीलकी आणि असेच काही; पण एकूणच या संज्ञा-संकल्पनांच्या सीमा व परिभाषा समजून घेतली तरच भाषणाचे मर्म कळते. उलटपक्षी ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा प्रकार होतो. भाषणाच्या आशयाविषयाच्या बाबतीत जे, तेच पुन्हा शैलीच्या संदर्भात. बहुतेक वक्ते ‘चऱ्हाट’ मेथडवाले असतात. स्थळकाळ, घटना, प्रसंगादीचे औचित्य न ठेवता ते सुसाट सुटतात. श्रोत्यांना ते मोजतच नाहीत.


अलीकडच्या सभासमारंभात तर सूत्रनिवेदक हाच अध्यक्ष, वक्ते, श्रोते या सर्वांचा बाप असतो. त्याच्या बाजूने बोलायचे तर ‘सूत्र’ साक्षात भगवंतासारखे अलख, निरंजन नि अरूप असल्याने दिसतच नाही. म्हणून ते सोडण्याचा प्रश्नच नाही. प्रत्येक वक्त्याच्या बोलण्यावरही त्याची बोलंदाजी ठरलेली असते. थर्ड अंपायरगत त्याची मल्लीनाथी सुरू असते. स्वागत-परिचय-प्रस्तावनाकारही पुष्कळदा पीळ पीळ पिळतो. आभारप्रदर्शकसुद्धा बऱ्याचदा त्याचाच भाऊ निघतो. आपलेच मुख्य भाषण असल्याचे समजून बोल बोल बोलत राहतो. धन्यवाद-अभिनंदन नि काय काय करतो. तर ही अशी आपल्याकडील भाषणांची सुरस गाथा. गंमत म्हणून सहज वाटते की, भाषणावर कर बसवायला हवा. त्यातून श्रोत्यांच्या कर्णविकारावर उपचार तरी करता येतील. एका सभेत तर एक आभारप्रदर्शक संशोधित पुरवणी यादी हातात घेऊन नव्या जोमाने पुन्हा व्यासपीठावर चढले. याचा मथितार्थ एकच तो म्हणजे, व्यासपीठावरून कधी कधी मंचावरून (मंचकावरूनसुद्धा) शब्दांचा भडिमार अनिवार सुरू असतो. वास्तविक, ‘वादे वादे जायते बोध:’ म्हणून भाषणासारख्या एकतर्फी शब्दव्यवहारापेक्षा संभाषण, संवाद-वाद-विचार, प्रतिवाद, खंडनमंडन, चर्चाचिकित्सा, विचारविमर्श हेच हितकारक व ज्ञानवर्धक आहे. शब्दाशब्दांच्या पारस्परिक सेतूमुळे मने जवळ येऊन ती जोडली जातात. ये हृदयीचे ते हृदयी घातले जाते. विचारांचे आभाळ होऊन अंधाराचे किंतू-किल्मिषांचे जाळे मिटून जाते. म्हणूनच बोलणाऱ्याने ऐकणाऱ्याचेही ऐकायला हवे. त्याला उचित असा प्रतिसादही द्यायला हवा. आपल्याप्रमाणेच त्यालाही बोलता येते, हे लक्षात घ्यायला हवे. नाहीतर तो तुमच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो. असो. यातूनच शब्दांचे दळणवळण होते. ज्ञानाचे क्षेत्रफळ विस्तारते. संभाषण हाच सकळजन शहाणे होण्याचा खरा मार्ग आहे. त्यातून सबुरी आणि संयमाचे संगोपन व संवर्धन होऊन मनामनाची कवाडे स्वागतशील होतात. सुसंस्कृत नि सत्त्वशील समाजाची बांधणी होते.


चांगले उत्तम वक्ते आपल्याकडे सर्वकाळात होते. अर्थात त्यांची संख्या मोजकीच होती. हापूसच्या झाडाला माफकच; पण मधुर फळे असतात. चांगला वक्ता सर्वांना प्रिय असतो. स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. राधाकृष्णन, यशवंतराव चव्हाण, वाजपेयी, राजनारायण, बॅ. नाथ पै, प्रिं. गोकाक, आरिफ बेग, तारकेश्वरी सिन्हा, पं. नेहरू, क्रांतिसिंह नाना पाटील आणि अगदी अलीकडची उदाहरणे - शरद पवार, अण्णा डांगे, आर. आर. पाटील, एन. डी. पाटील, शिवाजीराव भोसले, राम शेवाळकर, कोळसे-पाटील, डॉ. आ. ह. साळुंखे, शिवाजीराव नाईक, आदींच्या भाषणांना भाषण न म्हणता हितगुज म्हणावे लागेल. कारण त्यात संवाद साधण्याची असोशी आहे. आता नको नको म्हणताना रहीमचा दोहा आठवलाच - जीभ आपली वाटेल ते बोलून तोंडात जाऊन बसले आणि जोडे मात्र कपाळाला खावे लागतात.

solved 5
General Knowledge Monday 5th Dec 2022 : 13:06 ( 1 year ago) 5 Answer 3944 +22